न. प.च्या तत्कालीन मुख्याधिकाऱयांवर कारवाईची मागणी
वार्ताहर / :कुडाळ
आपल्या पदाचा गैरवापर करून तीन अपत्य असल्याची माहिती शासनापासून लपवून फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळचे तत्कालीन मुख्याधिकारी देवानंद कृष्णा ढेकळे (सध्या राजापूर) यांची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने चौकशी करून शासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास मंत्र्यांनी दिले होते. मात्र, पुढे याबाबत काहीच स्पष्टता न झाल्याने कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली 26 जानेवारी सकाळी 8 वाजल्यापासून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
तीन अपत्ये असतानाही ढेकळे यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी तेली यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तसेच ढेकळे यांनी ही माहिती शासनापासून दडवून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फोजदारी स्वरुपाची कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सामंत यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे 23 फेब्रुवारी 2020 रोजी लेखी मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरविकास मंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाची त्वरित चौकशी करावी. तसेच आपल्या अभिप्रायासह अहवाल तात्काळ शासनास सादर करावा, असे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले होते. परंतु या आदेशानंतर पुढे चौकशी व अहवालाबाबत काय झाले? याची कोणतीही माहिती तेली यांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून याबाबतचा अभिप्राय शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी 16 ऑक्टोबर 2020 रोजी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आपण बेमुदत उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करू नये, असे रत्नागिरी जिल्हा प्रशासन अधिकाऱयांनी कुडाळ नगराध्यक्ष तेली यांना पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, तेली यांनी आपण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.








