प्रतिनिधी / सांगली
आज भारतभर फक्त शेतकरी आणि कामगार चळवळीच उरल्या आहेत. त्याही संपवण्याची व्यवस्था देशात निर्माण होत आहे. गेले वर्ष झाले दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन मोडून काढण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे या बिकट परिस्थितीत कामगार आणि शेतकऱ्यांनी एकमेकांना आधार देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले.
राजमती भवन येथे आयोजित दूरसंचार कर्मचाऱ्यांच्या नॅशनल फेडरेशन ऑफ टेलीकॉम एम्प्लॉईज या संघटनेच्या पाचव्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी संघटनेचे केंद्रीय महासचिव चंदेश्वर सिंग उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, नवे कायदे आणून शेतकरी व कामगार संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. ते प्रयत्न हाणून पाडण्यासाठी चळवळी जिवंत राहिल्या पाहिजेत.
उत्तम चालणाऱ्या सर्व कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु आहे. आडवे येणाऱ्यांचा काटा काढला जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होते, तेच आज भाजपमध्ये राहून चळवळ संपवण्याचे काम करताहेत.चंदेश्वर सिंग म्हणाले, देशाला धोका असल्याचे सांगत सरकारने बीएसएनलचा चीनसोबत करार नाकारला, स्वतः मात्र अब्जावधींचा व्यापार करत आहे. बीएसएनएलला फोरजीसाठी परवानगी दिली नाही. मोदींचे बोलणे व करणी यात फरक आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्ही. एम. बांडी, जिल्हा उपमहाव्यवस्थापक जे. बी. कांबळे, आर. एस. सूर्यवंशी, एम. एस. अडसूळ, एच. डी. मोहिते आदी उपस्थित होते. ए. पटेल, सी. जी. जगताप, एम. आर. पाटील आदींनी संयोजन केले.
Previous Article”त्या” मुख्याध्यापकाला झाली अटक
Next Article पुलाची शिरोली येथे वाहन चोरी प्रकरणी एकास अटक








