प्रतिनिधी/ सातारा
शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या भागात ऐन दिवाळीत नागरिकांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ पंधरा मिनिटे पाणी येत आहे. नागरिकांना स्वतःच्या वाहनाने व खासगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंत्याचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिवाळी सणात नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सातारा शहराच्या हद्दवाढीत शाहूपुरी ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. शाहूपुरीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. ग्रामपंचायतीचा वचक होता. पण आता शाहूपुरी ग्रामपंचायत बरखास्त झाल्यावर सातारा पालिकेकडे सूत्रे गेली आहेत. पाणी पुरवठय़ाबाबतीत तक्रारी वाढू लागल्या आहेत. गेल्या चार महिन्यात काही भागात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही नागरिक खासगी टँकर करून पाणी आणत आहेत. केवळ 15 मिनिटे पाणी येते ते ही नुसताच नळाला आवाज येतो. प्राधिकरणाच्या अभियंता यांना याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यातर त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
अशी केली होती अभियंत्यांकडे तक्रार
गेले चार महिने झाले साहेब आठवडय़ातून दोन वेळा मला आम्हाला टँकर घ्यावा लागतो. तुम्हाला पिक्चर असल्यामुळे काहीच बोलता येत नाही. वास्तव खूप खूप भयानक आहे. विशेष करून तुम्ही लक्ष द्या व पाणीपुरवठा सुरळीत कराल याची खात्री मला पूर्ण आहे, अशी तक्रार अभियंत्याकडे करताच त्या नागरिकाच्या तक्रारीचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे शाहूपुरीतील तक्रारदार राजू केंडे यांनी सांगितले.









