वार्ताहर/ टाळसुरे
कोकणातील पारंपरिक मच्छिमार हा एलईडी मच्छीमारीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. जोपर्यंत एलईडी मच्छीमारी बंद होत नाही तोपर्यंत मच्छीमार बांधवाना दिलासा मिळणार नाही. पारंपरिक एलईडी मासेमारीसंदर्भात नवा कायदा करून एलईडीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील पारंपरिक मच्छमाराला सावरणार आहोत. आघाडी सरकार पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही मत्स्य व बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात भेट दिली असता मच्छीमार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मच्छीमार बांधवांचा 200 कोटी रुपयांचा डिझेल परतावा येत्या डिसेंबरपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच बंदरातील पायाभूत सुविधा व जेटीचा विषय मार्गी लावणार आहोत. मच्छीमारांना सुधारित निकषांनुसार योग्य ती भरपाई देण्यात येणार आहे. तसेच निसर्ग चक्रीवादळात मोठय़ाप्रमाणावर नुकसान झालेल्या मासेमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल.
शेख यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी दापोली तालुक्यातील हर्णे बंदर, बाणकोट, केळशी या भागांना भेट देऊन तेथील मासेमार बांधवांशी चर्चा केली आणि नुकसानीबाबत माहिती घेतली. नुकसानुचे पंचनामे करताना मासेमार बांधवांच्या असणाऱया विमा दाव्यांवर परिणाम होणार नाही अशापद्धतीने नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱयांना यावेळी दिल्या. या दौऱयात त्यांच्यासमवेत आमदार भाई जगताप, दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार होते.
केळशी येथील खाडीमधल्या गाळाचा उपसा लवकरात लवकर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी सर्व अधिकाऱयांना केल्या. मासेमार बांधवांच्या डिझेल परताव्याबाबत शासनाने गतिमान पद्धतीने काम केले असून गेल्या पाच वर्षात थकीत राहिलेली रक्कम डिसेंबर 2019पर्यंतचा बॅकलॉग भरत सर्वांना अदा केली आहे असेही शेख म्हणाले. चक्रीवादळातील सर्व मासेमार बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी सांगितले.









