नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११ ते १४ एप्रिलदरम्यान कोरोना लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. देशात एकीकडे अनेक राज्य लसींचा साठा कमी असल्याने लसीकरण मोहीमेत अडथळा निर्माण होत आहे. मात्र असे असताना नरेंद्र मोदींनी ‘लस उत्स’व साजरा करण्याचं आवाहन केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी रविवारी जनतेशी संवाद साधताना उत्सव ही दुसरी लढाई असल्याचा उल्लेख केला. दरम्यान काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी यावरुनच सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधत कोरोना लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्ध अशी विचारणा केली आहे.
पी चिंदबरम यांनी एकामोगोमाग तीन ट्विट करत म्हटलं आहे की, एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं दुसरं युद्ध आहे. नेमकं हे काय आहे?.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये पी चिंदबरम यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे १८ दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?, अशी आठवण देखील पी चिंदबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून दिली आहे.
तिसऱ्या ट्विटमध्ये पी चिंदबरम यांनी म्हटले आहे की, पोकळ अभिमान, वकृत्व आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.









