परिसरात उडाली खळबळ, शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येईल मृत्युचे नेमके कारण
प्रतिनिधी / उस्मानाबाद
तालुक्यातील घाटंग्री शिवारात शनिवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला परंतु काही वेळातच बिबट्या बेशुध्द होऊन मृत्यू पावला. या भागात प्रथमच बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. घटनास्थळी वन अधिकारी घोडके यांच्यासह पथक दाखल झाले असून, बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शिवारात बिबट्याने डरकाळी फोडली. त्यानंतर नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. एका झाडाखाली बसलेला हा बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला. कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत गेली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्याठिकाणी पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा केला असून,उस्मानाबाद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
यावेळी उस्मानाबाद शहरापासून आठ किलोमीटरवर अंतरावर असलेला घाटंग्री शिवार डोंगराळ भाग असून,या भागात तसेच धाराशिव लेणी, हातलादेवी परिसरात जंगल आहे. परंतू या अगोदर कधीही या परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा नव्हती. मात्र आता हा मयत झालेला बिबट्या आढळून आल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील शेतकरी वर्ग हा संध्याकाळी रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातात मात्र या प्रकरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.









