वाई : वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना देशसेवा करत असताना लडाखमध्ये वीरमरण आले. हवामानातील बदलामुळे त्यांना काल श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी कुटूंबियांना याबाबत कळविण्यात आले. मांढरे यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
मांढरे यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षाचा मुलगा, दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव उद्या पहाटे दिल्ली येथे पोहोचेल. सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात असले येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.









