आळसंद सरपंचांची निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे मागणी
वार्ताहर / आळसंद
खानापूर तालुक्यातील आळसंद ते कार्वे गावाला जोडणारा संपुर्ण रस्ता व आळसंद गावातील गाव अंतर्गत रस्त्यासाठी निधी मिळावा अशी मागणी आळसंद ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच इंदूमती जाधव यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आळसंद येथून कार्वे, मंगरुळ, बामणी, हातनोली, तासगाव असा जाणारा प्र. जि. मार्ग 80 असून सदर रस्त्यावरुन आळसंद व परिसरातून बामणी येथील उदगिर शुगर व कार्वे,मंगरुळ परिसरातून आळसंद येथील विराज शुगर तसेच तासगाव तालुक्यातून क्रांती व सोनहिरा कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत असते. खानापूर व तासगाव तालुक्यातील नागरिकांना हा मार्ग सोयीचा असून सदर रस्त्याचे काम शासनाच्या निधीतून कमळापूर ते आळसंद व कार्वे ते हातनोलीपर्यंत पुर्ण झाले आहे.
मात्र आळसंद ते कार्वे या गावांना जोडणार्या 6 किमी रस्त्याचे अद्याप डांबरीकरण झाले नाही. तसेच आळसंद येथील मुख्य ओढ्यावरील अत्यंत जुने पूल पुर्णपणे निकामी झालेले आहेत. यामुळे नागरिकांना व ऊस वाहतूक करणार्या वाहनांदेखील अडथळा निर्माण होत आहे. तरी शासन स्तरावर याचा सहानुभूतिपूर्वक विचार होऊन सदर रस्ते कामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. तसेच आळसंद गावातील गावअंतर्गत व वाडीवस्तीवर जाणार्या रस्ते खड्डेमय व खराब झाल्यामुळे ग्रामस्थांना विशेषत: पावसाळ्यात अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याकरिता निधी मिळावा अशी मागणीही सरपंच इंदूमती जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नितीनराजे जाधव, कार्वेचे उपसरपंच विक्रम पाटील, माजी सरपंच बाबासो जाधव, आळसंदचे ग्रा. प. सदस्य भरत हारुगडे, भरत जाधव, धनाजी जाधव, आण्णासो जाधव, दिपक शिरतोडे आदी उपस्थित होते.








