विशेष प्रतिनिधी/ देवरूख
काजू बियांच्या व्यवसायातून आलेल्या पैशांच्या वाटणीवरून कोयत्याचे वार करत मित्राचा निर्घृण खुन केल्याची खळबळजनक घटना नजिकच्या आंबव येथे घडली आहे. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास हा प्रकार घडला असून आरोपी संतोष शंकर घाटे (रा. आंबव कातळवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप विठठल केदारी (43 रा. ओझरेखुर्द गवळवाडी) आणि आरोपी संतोष घाटे दोघेही मित्र होते. गेले काही महिने ते एकत्रित काजु बियांचा व्यवसाय करत होते. या व्यवसायातून मिळालेल्या पैशाची वाटणी करण्याबाबत शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास संतोषच्या अंगणात चर्चा सुरू होती. यात पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. या वादावादीचे पर्यावसान मारामारीत झाले.
हाणामारी सुरू असतानाच रागात असलेल्या संतोषने संदीपच्या डोक्यात लोखंडी कोयतीने तीन वार केले. डोक्यानंतर त्याने त्याच्या कानाजवळ मानेशजारी एक वार केला. यात संतोष गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या संतोषला तातडीने देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याना मृत घोषित केले. हा प्रकार भर वस्तीत घडल्याने खळबळ उडाली.
घटनेची खबर मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे शिरीष सासणे, साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निशा जाधव, तुषार पाचपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी संतोष घाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच खुनासाठी वापरलेला कोयता जप्त केला. संतोषवर भा.दं. वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला संध्याकाळी उशिरा देवरूख न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. या प्रकरणाची फ्ढिर्याद प्रकाश पांचाळ, आंबव सुतारवाडी याने देवरूख पोलिसांत दिली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत्









