शहरातील परिस्थितीने वाहनधारकांची दमछाक : प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था नसल्याने गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची संथगतीने कामे आणि पर्यायी वाहतुकीसाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहनधारकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरात जाण्यासाठी कोणत्याही चौकातून गेल्यास वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आरटीओ सर्कलसह शहरात ही परिस्थिती असल्याने वाहनधारकांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे बहुतांशी रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू आहे. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी इतर अरुंद मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आरटीओ सर्कल ते सम्राट अशोक चौकाकडे जाणाऱया रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची बाब ठरत आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या सम्राट अशोक चौकासह इतर ठिकाणी असलेल्या चौकात देखील अवजड वाहने एकाच वेळी आल्यास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची कामे सुरू असल्याने अरुंद झालेल्या रस्त्यांवर एकाचवेळी ट्रक, बस व खासगी वाहने येत असल्याने वाहतूक नियंत्रणाचे तीन-तेरा वाजत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीचा ताण इतर रस्त्यांवर वाढला आहे. बाजारातही वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.









