रस्ते, पूल बांधकामांचा समावेश : आयसोलेशन वॉर्डमधून 11 रुग्ण बाहेर : 21 रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
दुसऱया टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असतांनाच सोमवार 20 एप्रिलपासून जिह्यात महत्वाच्या कामांना सुरुवात होणार आहे. यामध्ये मुख्यत्वे रस्ते, पूल यांची बांधकामे केली जाणार आहेत. नागरी भागातील महत्वाची अपूर्ण कामे सुरू केली जाणार आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱयांची उपस्थिती पाच टक्क्यावरून दहा टक्क्यांवर नेण्यात आली आहे. तर समाधानाची बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमधून 11 रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. 21 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने 3 मे 2020 पर्यंत दुसरा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना सर्व सरकारी विभागांना दिल्या आहेत. त्यामध्ये सरकारी कार्यालयातील कर्मचाऱयांची उपस्थिती आता दहा टक्के राहणार आहे. तसेच शासकीय कामांना परवानगी देण्यात येणार आहे. 20 एप्रिलनंतर काही प्रमाणात महत्वाच्या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामध्ये रस्ते, पूल बांधकामांचा समावेश मुख्यतः असणार आहे. तसेच नागरी भागातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तर ग्रामीण भागात पावसाळय़ापूर्वी पूर्ण होणे गरजेची असलेली कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काही सूचना केल्या आहेत.
सर्व कर्मचारी, कामगार यांनी मास्क वापरावेत, काम करतांना पुरेसे सामाजिक अंतर ठेवावे, वेळोवेळी हॅन्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करावेत, कामगारांचा इतर नागरिकांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामाच्या ठिकाणी जिह्यातील कामगारांचा वापर करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत जिह्याबाहेरून येणाऱया कामगारांचा वापर करण्यात येऊ नये. कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी करावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर व मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावेत. कामाच्या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा. अनावश्यक गर्दी टाळून कमीत कमी कर्मचारी, कामगारांसह काम हाताळावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.
144 नमुन्यांचा अहवाल प्राप्त
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 46 व्यक्ती दाखल असून आजपर्यंत एकूण 166 नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 144 नमुन्यांचा आहवाल प्राप्त झाला असून 22 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. जिह्यात आजमितीस 377 व्यक्तींचे घरीच विलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 69 व्यक्ती आहेत. 28 दिवसांचे विलगीकरण कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 246 आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत थालसेमिआचे 10 रुग्ण, डायलेसीसचे 23 आणि केमो थेरपीचे एक रुग्ण यांना नियमित सेवा देण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत जिह्यातील कारागृहातील कैद्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी करून त्यातील दहाजणांवर किरकोळ आजारासंबंधी उपचार करण्यात आले. तर सावंतवाडी येथील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी 17 कैद्यांना किरकोळ आजारावरील उपचार करण्यात आले. जिह्यातील सात वृद्धाश्रमातील 372 व्यक्तींची तपासणी करून त्यांना रक्तदाब, मधुमेहाच्या औषधांचा पुढील दोन महिन्यांचा साठा देण्यात आला आहे. तसेच निवारा केंद्रातील व्यक्तींची वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. जिह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी 457 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
अ.क्र. विषय संख्या
1 घरीच विलगीकरण करण्यात आलेले 377
2 संस्थात्मक विलगीकरणात असलेले 69
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 166
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 144
5 आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने 1
6 निगेटिव्ह आलेले नमुने 143
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 22
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 46
9 सद्यस्थितीत जिह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण 00
10 रविवारी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 457









