ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधानांकडून हे कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली असली तरी संसंदेत हे कायदे मागे घेण्याची शेतकरी वाट पाहत आहेत. तसेच एमएसपीसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱयांनी केला आहे. आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त युनायटेड किसान मोर्चाने दिल्ली चलोची हाक दिल्याने दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सिंधू, गाझीपूर आणि टीकरी बॉर्डवर मागील एक वर्षापासून शेतकरी ठाण मांडून आहेत. आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील शेतकरी जल्लोष करणार आहेत. युनायटेड किसान मोर्चाने दिलेल्या निवेदनानुसार, दिल्लीतील विविध निषेध स्थळांवर हजारो शेतकरी पोहोचू लागले आहेत. दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमध्ये या निमित्ताने रॅली, धरणे आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे.
शेतकऱ्यांची एकजूट पाहता कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा मोठय़ा संख्येत बॅरीकेट्स उभारण्यात आले आहेत. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, सुरक्षादलाच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.









