प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील चिखलहोळ येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त विक्रीकर सहआयुक्त अशोकराव शांताराम पाटील (७१) यांचे रविवारी सकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
मुंबई येथे विक्रीकर विभागात त्यांनी सुमारे ३५ वर्षे सेवा बजावली. सन २०१० ला ते विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर शासनाने पुन्हा त्यांना तीन वर्षासाठी विक्रीकर विभागात पॅनलवर काम करण्याची संधी दिली. अत्यंत शांत, मनमिळावू व मितभाषी म्हणून ते परिचित होते. सेवानिवृत्तीच्या कालखंडानंतर त्यांनी सामाजिक कामात स्वत:ला झोकून दिले.
चिखलहोळ येथे तुळजाभवानी मंदीर उभारणीसह अन्य विकास कामांत त्यांनी मोठे योगदान दिले. विक्रीकर सहआयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावात शेती सांभाळली. परंपरागत शेती व्यवसायाला फाटा देऊन त्यांनी आधुनिक शेती करीत तरूणांना प्रोत्साहन दिले. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृत्ती बिघडली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील दिनानाथ रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचे रविवारी सकाळी निधन झाले.
नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव पुणे येथील पर्वतीमध्ये त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर रविवारी सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर चिखलहोळ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.








