उत्तरप्रदेश उपमुख्यमंत्र्यांची ट्विटरवर घोषणा : निवडणुकीपूर्वी राजकारण तापले
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या या एका विधानामुळे उत्तरप्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. मौर्य यांनी बुधवारी ट्विट करत अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराची निर्मिती सुरू असून आता मथुरेची तयारी असल्याचे म्हटले आहे. मौर्य यांच्या या ट्विटमुळे भाजप आणि संघाच्या अजेंडय़ात नेहमीच सामील अयोध्या, मथुरा, काशीच्या मुद्दय़ावरून आता अनेक प्रकारचे कयास वर्तविण्यात येत आहेत.
मौर्य यांनी स्वतःच्या ट्विटसोबत हॅशटॅग जय श्रीराम, हॅशटॅग जय शिव शंभू आणि हॅशटॅग जय श्री राधे कृष्ण देखील जोडला आहे. यापूर्वी मथुऱयामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी शाही ईदगाहमध्ये 6 डिसेंबर रोजी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापितन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मथुऱयामधील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. हा ईदगाह कृष्ण जन्मस्थान मंदिरानजीकच आहे.

अयोध्येत भगवान रामलल्लाच्या भव्य मंदिर निर्मितीमुळे भक्तांमध्ये मोठा आनंद आहे. अयोध्या आंदोलनावेळी आम्ही ‘अयोध्या हुई हमारी, अब काशी-मथुरा की बारी’ असा नारा द्यायचो. काशी आणि मथुरा दोन्ही आमच्या आहेत. काशीमध्ये कॉरिडॉर तयार झाला आहे. आता कृष्ण जन्मभूमीची वेळ आली आहे. हे सर्व कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि जनतेच्या आशीर्वादाने होत असल्याचे मौर्य यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले.
न्यायालयात याचिका
ईदगाहमध्ये मूर्ती स्थापित करण्याची धमकी स्थानिक न्यायालयाने 10 व्या शतकातील मशिदीला हटविण्याची मागणी करणाऱया याचिकांवर सुनावणी केल्यावर देण्यात आली होती. तर अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी अनमुती देण्यात आलेली नाही तसेच दिली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
करारानंतरची 53 वर्षे
मथुऱयामध्ये कौमी एकता मंचच्या सदस्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 6 डिसेंबर रोजी सुरक्षा प्रदान करण्याची विनंती केली आहे. शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण जन्मस्थान संस्थानच्या व्यवस्थापकांदरम्यान झालेल्या कराराला 53 वर्षे झाली आहेत. हा करार भंग करण्यात येऊ नये असे मंचाचे संस्थापक मधुवन दत्त चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. हा मुद्दा विनाकारण उकरून काढण्यात येतोय. उत्तरप्रदेशात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने सर्वांनी सजग राहण्याची गरज असल्याचे अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेने नमूद पेले आहे. तर जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य वासुदेवानंद सरस्वती यांनी अयोध्येनंर काशी विश्वनाथ आणि मथुऱयामध्ये कृष्ण जन्मभूमी मुक्त करविणार असल्याचे मागील वर्षी म्हटले होते.









