सातारा : अतिवृष्टीमुळे पाटण, जावली, महाबळेश्वर तसेच कराड तालुक्याचा काही भाग बाधित झाला आहे. अतिवृष्टीत जिवीतहाणी, शेतीचे नुकसान तसेच याबरोबर घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या नुकसानीच्या आराखड्यात कोणताही अतिवृष्टी बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
अतिवृष्टी बाधित नागरिकांसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक आज पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे मृत्यु झाला आहे, त्यांच्या वारसांना 5 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जे शेतकरी आहेत त्यांना स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याच्या शासनाच्या निकाषानुसार लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरु करावी. अतिवृष्टीमुळे गावांच्या पिण्याच्या योजना वाहून किंवा ना दुरुस्त झाले आहेत, अशा गावांना प्रत्येक शाखा अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून दुरुस्तीच्या खर्चाची आकडेवारी तयार करा.
अतिवृष्टीमुळे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या किंवा शेतीमध्ये मलबा आला आहे, याची स्वतंत्र यादी कृषी विभागाने तयार करावी. अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या काही गावांमधील घरे मातीखाली गाडली गेली आहेत. त्या गावातील नागरिकांची तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निवारा शेडची व्यवस्था लवकरात लवकर करावी. तसेच त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी प्रस्ताव करत असताना वन विभागाच्या जमिनीबरोबर खासगी जमिनीचाही पर्याय ठेवावा, अशा सूचना पाटील यांनी बैठकीत केल्या.









