कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
अजितदादा सांभाळून बोला नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते रविवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होतं, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आता मी उभ्या-उभ्या जास्त बोलत नाही, झोपेत सरकार कोणी आणलं? तुम्ही आणलं, शरद पवार साहेबही झोपेतून उठायचे होते. तोपर्यंत तुम्ही शपथविधी करुन मोकळे झालात. त्यामुळे झोपेत कसं सरकार आणायचं, हे तुम्हाला माहीत आहे. मी आपलं उपरोधिकपणे म्हणालो. मला असं वाटत होतं की, अजित पवारांसारखे भरपूर वर्ष राजकारणात असलेले नेते यांना आपण काल काय केलं याची आठवण असेल. पण त्यांना बहुतेक आपण काल काय केलंय याची आठवण नाही. ज्यांच्या मांडीला मांडी लावून तीन दिवसांसाठी का होईना सरकार केलं, त्यांच्यावर टीका करताना काहीतरी विचार करा, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना तलवारीचा धाक दाखवून शपथविधीसाठी नेलं नव्हतं. विचारपूर्वक केलं ना. तुम्हाला तुमचे 28 आमदार बरोबर आणले ते ठेवता आले नाहीत. सगळे शरद पवारांकडे पळून गेले. त्यानंतर तुम्ही महाविकास आघाडीतही उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांसोबत स्थापन केलेल्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्रीच. आता माहीत नाही उद्या पुन्हा नवं सरकार स्थापन होईल, त्यातही तुम्हीच उपमुख्यमंत्री असाल, तुम्ही मात्र सगळीकडे पाहिजे. तत्व नाही, व्यवहार नाही, कशाची कशाला सांगड नाही. ज्याचं सरकार त्याच्यासोबत मी जाणार, हे एकच तत्व. अजितदादा… जरा सांभाळून बोला, आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत, आम्ही बोलायला लागलो तर महागात पडेल, असा धमकी वजा इशारच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिला.
मराठा आरक्षण लगेच मिळण्यासाठी, मराठा आरक्षण सवलती सुरु करण्यासाठी, जो-जो संघर्ष करेल त्याच्यासोबत आम्ही आहोत, हे आम्ही दहा वेळा सांगितलं आहे. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. पण राजे असं म्हणाले की, आरक्षण मिळालं पाहिजे पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे पण कोरोना संपल्यानंतर बघुयात, त्यांची ही भूमिका आम्हाला मान्य नाही. कोरोनाचा काय संबंध? सगळं जनजीवन सुरु आहे. भ्रष्टाचार सुरु आहे. दोन हातांनी खाणं सुरु आहे. मग काय मराठा समाजानं कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचं का? बाकी आम्हाला मान्य आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Previous Articleम्हैसूर जिल्ह्यात ‘ब्लॅक फंगस’चे ५ बळी
Next Article मान्सूनचे आगमन लांबणीवर








