ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला कोरोना टाळायचा असेल तर मास्क घाला आणि नियमांचे पालन करा, अन्यथा महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा दिला आहे.
तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील सध्या स्वतः कोरोनाविरुद्ध लढाई देत आहेत. राजेश टोपे रुग्णालयात असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे संकट आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनचे संकट ओढवून नये, यासाठी राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचे आवाहन केले आहे.

ते आपल्या पत्रात म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणे जमले नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.
समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही. लॉकडाऊन टाळणे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने, असे आवाहनही टोपे यांनी महाराष्ट्राला केले आहे.








