प्रतिनिधी / सातारा
प्रवास सुखाचा व्हावा आणि वेळेत पोहच व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग झाला. पुणे- बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरून वाहन नेताना अक्षरशः गावची पांद बरी असेच चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे सातारा, कराड आणि जिल्ह्यातील व्हील अलायमेंटवाल्यांचा व्यवसाय तेजीत सध्या आहे. तर महमार्गाकडेला असलेल्या पँचरवाल्याच्या टपरी बाहेर टायरची थप्पी मोठी लागली आहे. दुचाकी वाहनधारकांकडून शॉक ऑबसर आणि सायलेंसरला मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यात महामार्गावर पडलेल्या खड्डे भरून घेण्यासाठी व रस्ता चांगला करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रस्ते प्राधिकरणच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतूकींच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. वेळेत आणि सुरक्षित वाहतुक करता येत नाही.खड्डेच खड्डे झाल्याने अपघात व वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर पडलेला प्रत्येक खड्डा हा वाहनाचे चाक वाकवून त्यास बेंड आणतो आहे. कित्येक चार चाकी वाहनांच्या रीमा वाकल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना चाके मिळाली नाहीत. याच खड्यामुळे व्हील अलायमेंट करणाऱ्या सातारा, कराड आणि शिरवळ येथील व्यावसायिकाना चांगले दिवस आले आहेत. लॉकडाऊनमध्ये एवढाच व्यवसाय महामार्गाच्या खड्यामुळे जोमात आहेत. तसेच टायर पँचर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महामार्गालगत असलेल्या टायर पँचरच्या टपऱ्याबाहेर बाद टायरची थप्पी लागल्याचे आणि पँचर काढण्यासाठी रांगा दिसत आहेत. तसेच दुचाकी वाहनाचे शॉकऑबसर आणि सायलेन्सर बाद होत असून त्याची मागणी वाढली आहे. मोठ्या वाहनाचे ही टायर आणि पाटे खराब होत आहेत.एकंदरच वाहनांच्या खराबीमध्ये वाढ झाली आहे. रस्ते प्राधिकरणाच्या विरोधात सातारा जिल्ह्यातून सामाजिक संघटना एकत्र होत आहेत. आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.









