वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या एप्रिल महिन्यात दक्षिण कोरियातील चेंगवोन येथे होणाऱया आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार नाही. क्वारन्टाईनच्या कडक नियमावलीमुळे भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाहीत. या स्पर्धेत सहभागी होणाऱया नेमबाजांसाठी दक्षिण कोरियातर्फे दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी सक्तीचे क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतल्याने नेमबाजांना सराव करताना अडथळा येत असल्याने भारताने या स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर स्पर्धा दक्षिण कोरियातील चेंगवोन येथे 16 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजित केली असून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनने अधिकृत मान्यता दिली आहे. दक्षिण कोरियातील या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रायफल, पिस्तुल आणि शॉटगन या विविध प्रकारात विविध देशांचे नेमबाज सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे 18 ते 29 मार्च दरम्यान विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित असून सदर स्पर्धा दिल्लीतील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात होणार आहेत. त्याचप्रमाणे कैरो येथे 22 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धा घेतली जाणार आहे. टोकियोमध्ये 25 ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱया राष्ट्रीय चाचणी नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज तसेच इतर काही देशांचे स्पर्धक सहभागी होणार होते. पण कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. भारतामध्ये 64 वी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा 10 एप्रिलपासून घेतली जाईल. या स्पर्धेतील रायफल नेमबाजी प्रकार भोपाळ येथे 14 ते 29 एप्रिल दरम्यान, पिस्तुल नेमबाजी प्रकार दिल्लीत 11 ते 29 एप्रिल दरम्यान त्याचप्रमाणे शॉटगन नेमबाजी प्रकार दिल्लीत 10 ते 24 एप्रिल दरम्यान घेतला जाणार आहे.









