दिग्गज कॉग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत प्रवेश
प्रतिनिधी/ वडूज
माण- खटाव या दुष्काळी तालुक्यात सहकारी कृषी उद्योगांची उभारणी करून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेले तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. मुंबईतील गांधी भवन ( मंत्रालयाशेजारी ) या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉग्रेसपक्षातील दिग्गज नेतेमंडळीच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे.
यापूर्वी रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामे करत काँग्रेस पक्षाची पाळुमुळे ही घट्ट केली. 2003च्या दुष्काळात श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौयाचे यशस्वी संयोजन केले होते. त्याचप्रमाणे कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक कॉग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा ,जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठी सिंचन योजना कार्यान्वीत होण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. प्रसंगी कृष्णा खोरे कार्यालयावर जनआंदोलन उभारून उरमोडी व जिहे कठापूर या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. याच भागात सहकारी उद्योगांची यशस्वीपणे उभारणी करणारे पहिले औद्योगिक क्रांतीचे ते आँयडाँल नेते ठरले. कायम दुष्काळी माणदेशातील जनतेच्या आर्थिक परिवर्तनासाठी रचनात्मक कामांची उभारणी करणारे भक्कम नेतृत्व म्हणून नावारूपाला आले . महाराष्ट्रातील सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा देणारे रणजितसिंह देशमुख यांची कल्पकता दिशादर्शक ठरत आहे. त्याचप्रमाणे फिनीक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण करून वृक्ष लागवड कार्यक्रमही राबविला. तसेच महिला व युवकांना स्वंयम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे आदि उपक्रम सुरू केले आहेत. दोन सुतगिरणीच्या यशस्वितेनंतर शुगर ग्रीड साखर कारखाना लि .पिंगळी ता. माण येथे 10 मेगावॅट विज प्रकल्प व 40 केएलपीडी डिस्टलरी या उपपदार्थ निर्मितीसह कारखान्याच्या कामाचा शुभांरभ झाला असून पुढील एक वर्षात काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होईल.
मध्यंतरीच्या काळात काँग्रेस मधील अंतर्गत कलहातून त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. तदनंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी गत दुष्काळात दोन्ही तालुक्यात सुमारे 70 चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा दिला होता. सिंचन योजनेद्वारे कातरखटाव परिसरात शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावला. परंतू काँग्रेस विचारधारेचा पगडा असलेले रणजितसिंह देशमुख शिवसेनेत फारसे रमले नाहीत.2019 मध्ये विधानसभा निवडणूकीत झालेल्या राजकीय उलथा- पालथी मध्ये त्यांनी शिनसेनेचा त्याग करून ’आमचं ठरलय’ या सर्व पक्षिय कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उभा केलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता . तेव्हापासून ते अधिकृतपणे कोणात्याच राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांना गळ घातली. विशेषता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी प्रथम पासूनच असलेली रणजितसिंह देशमुख यांची जवळीक सर्वज्ञात आहे. जिह्यातील काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक सहकायांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरून रणजितसिंह देशमुख यांना काँग्रेस पक्षात सक्रिय करण्याची विनंती केली. पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला. बुधवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यातील काँग्रेसचे मंत्री , वरिष्ठ नेते यांच्या उपास्थितीत रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात स्वगृही प्रवेश करणार आहेत. नुकतेच जिह्यातील जेष्ठ नेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशानंतर रणजितसिंह देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे माण- खटाव विधानसभा मतदारसंघात कॉग्रेंस पक्ष निश्चितच भरारी घेईल. तसेच सातारा जिल्हयातंही त्यांच्या या कॉग्रेस प्रवेशाने पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेईल असा आत्मविश्वासही जिह्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यामधून उमटत आहे.









