1 जून ते 31 जुलैपर्यंत दोन महिने बंदी कालावधी
प्रतिनिधी / मालवण:
महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम किनाऱयावर एकाचवेळी 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू होणार आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या मासेमारी बंदी कालावधीला एक जूनपासून सुरुवात होणार आहे. तर एक ऑगस्टला मासेमारीला सुरुवात होणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱया मच्छीमारांविरोधात महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 121 किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. शासन निर्णय होण्यापूर्वी महाराष्ट्रात 10 जून ते 16 ऑगस्ट असा मासेमारी बंदी कालावधी होता. मात्र, महाराष्ट्रालगत असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ व गुजरात या राज्यांचा मासेमारी बंदी कालावधी लवकर संपत असल्याने तेथील टॉलर्स, बोटींची घुसखोरी होऊन महाराष्ट्राच्या किनाऱयावरील मासळीची लयलूट केली जायची. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधव व संघटनांनी शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
जीवघेणा संघर्ष टाळला पाहिजे
मच्छीमार हंगाम बंदी कालावधीतही काही ठिकाणी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने जीवावर उदार होऊन काही मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याचे दिसून येते. ही मासळी मच्छी मार्केटमध्येही चढय़ा भावाने विक्रीसाठी उपलब्ध होते. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांमध्ये जनजागृती करून जीवावर उदार होत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करावे. कारवाईचा इशारा देऊन ज्या ठिकाणी काही होत नसेल, तर तेथे मच्छीमारांशी आपुलकीने चर्चा करून त्यांचे हित त्यांना समजावून सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता लक्ष खाडीकिनारी
यांत्रिक बोटीच्या सहाय्याने करण्यात येणारी मासेमारी सोमवारपासून बंद होत असल्याने आता मत्स्य खवय्यांना खाडय़ांमधील मासळीवर लक्ष ठेवून राहवे लागणार आहे. बिगर यांत्रिक बोटीतून मासेमारी करण्यास कोणतीही बंधने नाहीत. त्यामुळे मच्छीमार व खाडीकिनारी राहणाऱया मत्स्यप्रेमींना भरतीच्या पाण्यात खाडीत येणारी मासळी पडकण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
मच्छीमारांची लगबग सुरू
समुद्रातील घटते मत्स्योत्पादन व राज्या-राज्यातील हद्दींमध्ये मासेमारीसाठी घुसखोरी करून मत्स्यबीजाची केली जाणारी लुट या वाढत्या तक्रारींमुळे केंद्र सरकारने पश्चिम किनाऱयावर 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधी लागू केली. या कालावधीत पावसाळय़ात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱयालगत येतात. माशांच्या या प्रजनन कालावधीत अंडय़ांवरील मासे पकडले गेल्यास मोठय़ा प्रमाणात मत्स्यबीजाचा नाश होतो. हे सर्व टाळण्यासाठी बंदी कालावधी शासनाने लागू केला आहे. अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले, तरी मच्छीमारांना बंदी कालावधी पाळणे बंधनकारक आहे. एक ऑगस्टपासून राज्यात एकाच वेळी पुन्हा मासेमारी व्यवसायाला सुरुवात होणार आहे. या बंदी कालावधीत मासेमारी करणाऱया मच्छीमारांविरोधात महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 अन्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठय़ा नौका किनाऱयावर सुरक्षितस्थळी आणून ठेवण्यासाठी मच्छीमार बांधवांची लगबग सुरू झाली आहे.









