प्रतिनिधी / कराड :
पतीच्या अपघाती निधनाने मानसिक खचलेल्या मातेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कराडात बुधवारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकारापुर्वी मुलांच्या आईने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यावरून पोलीस चौकशी सुरू आहे.
कराड शहरातील वाखान परिसरात हे कुटुंब वास्तव्यास होते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा काही महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर पत्नीसह दोन मुले त्याठिकाणी राहत होती. मात्र पतीच्या निधनामुळे आपण व्यथित झालो असून त्यांच्याशिवाय जगण्यात अर्थ नाही, अशी चिठ्ठी लिहून ठेवून संबंधित महिलेने बुधवारी दुपारी विषारी औषध प्राशन केले. तसेच स्वतःच्या हाताची नाडी कापून घेतली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी घरात धाव घेतली. त्यावेळी महिलेची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. तर महिलेची प्रकृती गंभीर होती. नातेवाईकांनी तातडीने तिला कृष्णा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुलांचा गळा दाबून मी स्वतः आत्महत्या करीत आहे, असे त्या महिलेने चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.









