प्रतिनिधी / सातारा :
एसटीची सुरुवात झाल्या पासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर एसटीचे चाक कधी थांबले नव्हते पण पहिल्यांदा कोरोनाच्या संकटांने मात्र प्रत्येक डेपोत शेकडो गाडय़ा चक्काजाम होऊन थांबल्या आहेत. मात्र शासनाने इतर राज्यातील श्रमिक या परिस्थितीत सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहचावेत म्हणून एसटी ला हाक दिली. एसटीचे सर्व अधिकारी, चालक, वाहक या मोहिमेसाठी तयार झाले. सातारा बसस्थानकातून महाराष्ट्रातील इतर जिल्हय़ांबरोबरच परराज्यातील कामगारांना पोहोचवण्यासाठी ही लालपरी धावली असून हजारो कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवून तिने कर्तव्य तत्परता दाखवली आहे.
गाव तिथे एसटी, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन 1जून 1948 पासून धावते आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेडय़ापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेडय़ापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेडय़ापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून एसटी ने आता पर्यंत राज्यातील आपत्ती असेल, निवडणुका असतील त्यात सहभाग नोंदवून उपयुक्तता सिद्ध केली आहे.
विभागीय प्रमुख सागर पळसुले यांच्याशी याबाबतीत संपर्क साधला त्यांनी लगेच किती बस कुठे गेल्या.. याचा तपशील आम्हाला दिला. काल मध्य प्रदेशच्या रेवा येथे श्रमिक रेल्वे गेली.. आज राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे गेली त्यावेळी जिह्यातील अकरा तालुके आणि मोठय़ा गावातील सर्व श्रमिकांना विना मोबदला सातारा रेल्वे स्थानकावर सोडले. कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता एक सामाजिक दायित्व म्हणून कोणतेही आढेवेढे न घेता मोठय़ा उत्साहानी चालक आणि वाहक यांनी ही जवाबदारी फत्ते केली. तामिळनाडूतील सेलम असेल वा उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्यप्रदेशातील सुलतानपूर अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व सामान्यचं भूषण असलेली एसटी तिथे गेली लोकांना सुखरूप पोहचवले लोकांच्या दुवा घेऊन चालक आणि वाहक परतले. अजूनही काही गाडय़ा बाहेरच्या राज्यात जायाला सज्ज झाल्याचे पळसुले यांनी सांगितले.
चालक, वाहकांच्या कामगिरीला सलाम केंद्र सरकारनी परवानगी देताच शेकडो लोकांना रेल्वे आणि बसनी सोडण्याची तत्परता शासनांनी दाखवली आणि महाराष्ट्र कोणत्याही प्रसंगात आपलं सर्वस्वपणाला लावून झुंजतो हे या कोरोनाच्या जागतिक संकटातही अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे. आम्ही संकटालाही धीराने भिडतो हा आमचा इतिहास आहे तोच धागा वर्तमानतही आम्ही गिरवतो त्यामुळे या कोरोना संसर्गावरही मात करू असा निर्धार करून सर्वजण लढतायत आपापल्या जागेवरून. चला कोरोनावर मात करू








