मंगळवार तळे रोडवरच्या किरकोळ विक्रेत्यांना हटवले
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागे किरकोळ विक्रते कसेही बसत होते. त्या विक्रेत्यांकडून व त्यांच्याकडे खरेदी करणाऱयांकडून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत होता. कसलीही काळजी घेतली जात नव्हती. त्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. शनिवारी सकाळी वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱयांनी त्या विक्रेत्यांना हटवले. कोव्हिड 19 ची कसलीही काळजी नाही तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा दम भरताच काही विक्रेत्यांची मात्र तारांबळ उडाली होती.
सातारा शहरात अजूनही काही नागरिकांकडून जिल्हाधिकाऱयांच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याला हरताळ फासला जात आहे. कसलेही आत्मभान नाही. याचेच चित्र राजवाडा बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या मंगळवार तळे रोडवर दिसत आहे. रोज सकाळी किरकोळ विक्रेते युनियन भाजी मंडई, विठोबाचा नळाच्या तिकाटण्यापर्यंत बसलेले असतात. कोणी भाजी विक्री करते, कोणाचा हातगाडा वाटेल लावलेला असता. वाहतूकीचा आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असतो. शनिवारी सकाळी तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी एकटीच होती. त्यांनी विक्रेत्यांना अगोदर समजूतीने सांगितले. तरीही ऐकनात की पुन्हा त्यांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आपला बोऱया आवरण्याची गडबड उडाली होती.








