ऑनलाईन टीम / मुंबई :
महाविकासआघाडी सरकारच्या 10 रुपयात जेवण देण्याची योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या थाळीचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड व एक फोटो बंधनकारक आहे.
समाजातील गरीब वर्गासाठी येत्या 26 जानेवारीपासून राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबईतील 15 ठिकाणांचा समावेश असेल. 10 रुपयात थाळी केंद्र चालवणाऱयांना राज्य सरकारकडून शहरी भागात 35 रुपये, तर ग्रामीण भागात 25 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
पण ही योजना राबवताना बोगस लाभार्थी दाखवले जाऊ नयेत यासाठी राज्य सरकारकडून आधार कार्ड आणि फोटो काढण्याची अट टाकण्यात आली आहे. या योजनेसाठी सॉफ्टवेअर बनविण्यात आलं आहे. त्यात आयडेंटीसाठी तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागणार आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या संकल्पनेतूनच 10 रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे.









